मला T2DM आहे असे माझ्या डॉक्टरांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगीतले तेव्हा माझी स्वाभाविक प्रतिक्रिया अशी होती:
“डायबेटीस! इतक्या लौकर ? म्हणजे अजून तसे माझे वय झालेले नाही“
हा प्रश्न मी डॉक्टरांना विचारला खरा पण त्याच वेळी आणखी दोन विचार माझ्या मनात थैमान घालत होते:
१) पहिला विचार मनात आला , ‘मला आणि मधुमेह ? साला हे कसे शक्य आहे? मधुमेह व्हायला मी थोडाच लठ्ठ आहे ? असा विचार माझ्या मनात आला याचे कारण तो पर्यंत मी लठ्ठ व्यक्तींना(च) मधुमेह होतो असे (चुकीचे) ऐकले होते . तेव्हा ही आणि आत्ताही माझी गणना कधीच ‘लठ्ठ’ म्हणून झालेली नाही, मी कायमच सडपातळ / अंगा बरोबर असाच राहीलो आहे. खरे तर थोडेसे जाड , गुटगुटीत असावे याची मला हौस होती (सोनाक्षी सिन्हा म्हणुनच मला जाम आवडते!) आणि त्या साठी नोकरीला लागल्या नंतर वजन वाढावे म्हणून मी चक्क वेट गेन पावडर चा खुराक ही चालू केला होता , हो, खोटे कशाला बोला ! (त्या पावडरीने काहीच फरक पडला नाही हा भाग वेगळा.) २००८ मध्ये मधुमेहाचे निदान झाले तेव्हा माझे वजन ७० किलो होते म्हणजे माझ्या उंचीच्या हिशेबातल्या आदर्श वजना पेक्षा फक्त दोन एक किलो जास्त. मग मला मधुमेह कसा झाला? लठ्ठ व्यक्तींना व्हायचा तो मला कसा काय झाला ?
२) दुसरा विचार असा आला , म्हणजे तो विचार नव्हता तर चक्क एक अपराधी पणाची भावना होती,
त्याचे असे की मी सांगलीचा , पैजा लावून , पट्टीने गोड खाणार्यांच्या , अमाप दुधदुभत्याच्या प्रदेशातला, जिलेबी, गुलाबजाम, श्रीखंड , बासुंदी , पेढे , कलाकंद , तुपात ओथंबलेला चपचपीत गोड मिट्ट शिरा (त्यातही केळे , अननस, आमरस घालून केलेला अधिक आवडीचा!) , पुरणपोळी, कडबू, मैसुरपाक, बालूशाही, मोहनथाळ, गव्हाची खीर हे पदार्थ तर माझे जीव का प्राण.
तसेही आमच्या घरात गोड खाण्याचे प्रमाण जास्त आणि आई तर साक्षात अन्नपूर्णा मग काय विचारता, (दोन्ही) जेवणात गोड नसेल तर जेवण झाले असे वाटूच नये अशी भक्कम गोडघाशी माणसे आम्ही. गोड पदार्थ उपलब्ध नसेल तर चक्क गुळाचा एक भक्कम खडा (खडा कसला म्हणायचा त्याला, मोठे ढेकूळच असायचे ते!) पानात असायचाच.
लग्न समारंभातल्या जेवणावळीत मला एक दोन जिलब्या कोणी वाढल्याच नाहीत! जिलेबीचे आख्खे ताट पानात रिकामे केले जायचे तेव्हाच वाढणार्याचे आणि माझेही समाधान व्हायचे! आणि मी ही त्या जिलब्यांवर जादाचा गरम पाक ओतुन घेऊन सगळे चवीने (काही वेळा तर पैज लावून!) फस्त करायचो. बसल्या बैठकीत ३० गुलाबजाम नॉन स्टॉप खाण्याचा पराक्रम मी एकदा करून दाखवला होता. बुंदीचा लाडू (त्यातही मोतीचूर फार आवडीचा) मी सरळ कधीच खाल्ला नाही, दोन – चार लाडू कुस्करून घ्यायचे , ते बुडून वर दोन बोटे भरतील असा साखरेचा केशर युक्त गरमागरम पाक आणि त्यावर साजुक तुपाच्या कडकडीत धारेचे नक्षीकाम असा माझा ब्येत असायचा.
नोकरी निमित्त पुण्यात आल्या नंतर चितळेंची अंबा बर्फी , गुप्ता कडचे धारवाडी पेढे , मैसूर , काका हलवाई ची साजूक तुपातली जिलेबी ,अंजीर बर्फी , काजू कतली यातले काही खाल्ले नाही असा माझा दिवस गेला नसेल. यातले काही वेळेत मिळाले नाही तर वेळ मारून नेण्यासाठी, दुधाची तहान ताकावर भागवण्या साठी, कॅडबरी डेअरी मिल्क नाही तर गेला बाजार लोणावळा चिक्की (मी आणि चिक्की ? यक्क, इतके डाऊन मार्केट ? काय करणार , कोणावर काय वेळ येईल ते सांगता येत नै भाऊ !) .
गेल्याच (डिसेंबर २०१८) महिन्यात पुण्यात एका लग्नसमारंभाला जाण्याचा योग आला, शुद्ध साजुक तुपातल्या, धप्प केशरी, नाजूक शेलाट्या , पाकाने मुसमुसलेल्या , वळसेदार जिलेबीचा आणि केशराची , सुक्या मेव्याची मनमुराद उधळण केलेल्या घनदाट रसमलाईचा भक्कम ब्येत पाहून माझ्या पोटात आगडोंब उसळला हो, नजर सारखी सारखी त्या जिलब्यां कडे जात होती, बाकीचे लोक लाजत मुरडत, नखरे करत, नक्को नक्को म्हणत , लहानात लहान जिलेबी हेरुन डिश मध्ये घेत होते आणि इकडे त्या परातीत ठेवलेल्या सार्या जिलब्या एका दमात फस्त करण्याची क्षमता बाळगून असलेला मी , आंवढे गिळत केवीलवाण्या, हताश अवस्थेत सॅलड च्या स्टॉल पुढे उभा होतो.
इकडे मी मन मारत , आवंढ्यावर आवंढे गिळत उभा होतो तर तिकडेे ती ‘जिलेबी’ नामक नखरेल नार तिच्या लाडीक अदां तुन भुरळ घालत होती..
खुल्ले आवताणच ते !
“
आइये मेहरबाँ, बैठिये जानेजा ..
शौक़ से लीजिये जी, इश्क की इम्तहाँ
आइये मेहरबाँ …
कैसे हो तुम नौजवाँ, इतने हसीं महमाँ
कैसे करूँ मैं बयाँ, दिल की नहीं है ज़ुबाँ
आइये मेहरबाँ …
देखा मचल के जिधर, बिजली गिरा दे उधर
किसका जला आशियाँ, बिजली को ये क्या खबर
आइये मेहरबाँ …
“
कित्ती वेळा मनात आले…
चल खा रे एक जिलेबी, नै तरी शुगर नॉर्मल आहे म्हणतोस ना मग एका जिलेबीने काय होतेय, कोठल्या कोठे जिरून जाईल,
….
आणि हे बघ , फक्त आजचाच दिवस रे, उद्या पासून कोण जिलेबी खातेय बाब्बा , उद्यापासून आपण बरे आपला डायबेटीस बरा…
आणि एकच जिलेबी खाऊन थांबायचेय , सच्ची, यकदम प्रॉम्मीस, मग तर झाले ?
….
बर रायलं , ना तेरा ना मेरा, येक नै तर नै किमान अर्धी तरी, चल हो पुढे , घे द्येवाचे नाव, होऊन होऊन काय होईल?
‘काई ह्यईल ते हुदे कोर्टात जाऊदे फिकीर त्याची करु नको, रंगाने तू दिसतेस केसरी, जवळ ये लाजू नक्को, य्ये जवळ ये लाजू नको”
… मनात चक्री वादळ उठले होते, एक दोनदा माझी पावलें त्या जिलेबीच्या स्टॉल कडे वळली देखील, खोटे कशाला बोला! पण शेवटी माझ्यातल्या मनोनिग्रहाचा विजय झाला.
मी त्या नखरेल जिलेबीला ठणकावून सांगीतले…
“
आज खाने की ज़िद ना करो
यूँ ही पहलु में बैठे रहो . आज खाने की ज़िद न करो
हाय मर जाएंगे , हम तो लुट जाएंगे
ऐसी बातें किया ना करो , आज खाने की ज़िद ना करो
तुम ही सोचो ज़रा , क्यूँ ना रोकें तुम्हें
जान जाती है जब , उठ के जाते हो तुम
तुमको अपनी क़सम जानेजां , बात इतनी मेरी मान लो
आज खाने की ज़िद ना करो
यूं ही पहलु में बैठे रहो , आज खाने की ज़िद ना करो
डायबेटीस की कैद में ज़िन्दगी है मगर , चंद घड़ियां यही हैं जो आज़ाद है
इनको खो कर मेरी जानेजाँ , उम्र भर ना तरसते रहो
आज खाने की ज़िद ना करो
हाय मर जाएंगे , हम तो लुट जाएंगे
ऐसी बातें किया ना करो , आज जाने की ज़िद ना करो
कितना मासूम रंगीन है ये समां, हुस्न और इश्क़ की आज बैराज है
कल की किसको ख़बर जानेजाँ , रोक लो आज के दिन को
आज खाने की ज़िद ना करो
यूँ ही पहलु में बैठे रहो , आज खाने ने की ज़िद ना करो
हाय मर जाएंगे , हम तो लुट जाएंगे
ऐसी बातें किया ना करो , आज खाने की ज़िद ना करो
”
डिश भर टमाटू , काकडी, गाजर , बीट च्या चकत्या लिंबू पिळून वरतून पुदिन्याची हिरवी चटणी थापून मोठ्या हिंमतीने पोटात ढकलल्या आणि हात धुवायला वॉशबेसीन कडे वळलो. वाईट इतकेच वाटले की मी सॅलड खाल्ले दहा रुपयांचे पण त्या बिचार्या वधू पित्याला मात्र माझ्या ताटाचे त्या केटररला ३००-३५० रुपये तरी नक्कीच मोजावे लागले असतील. (पुण्यात काय रेट चाललाय हो जिलेबी- रसमलाई –अशा डब्बल स्वीट युक्त जेवणाचा? ) साला, मला हा मधुमेह नसता ना तर आमच्या सांगलीचा हिसका दाखवून नुसत्या जिलेबीतच त्या केटररला ४०० रुपयांना धुतला असता आणि वरतून जी काही रसमलाई मी वाट्या भरभरून ओरपली असती त्याचा हिसाब वायलाच!!
मधुमेह झाला हे कळताच मला हे जिलब्या, बुंदीचे लाडू, श्रीखंड, घटा घटा रिचवलेली तांब्या भर बासुंदी . मिरजेचा शिवाप्पा हलवाई , उडव अजून दोन प्लेट कलाकंद , आज काल असे खवैय्ये नाय भेटत रे असे म्हणत प्रेमाने आग्रह कर करुन मिठाई खिलवणारे ‘मंगल मिठाई’ चे रणभोर काका , सारे सारे आठवले आणि भडभडून आले, नक्कीच मी इतके गोड खाल्ले म्हणनूच मला मधुमेह झाला असणार, छे , मी इतके गोड खायला नक्को होते. एक प्रचंड अपराधी पणाची भावना माझ्या मनात उचंबळून आली.
खरेच का लठ्ठ असले की मधुमेह होतो ?
खरेच का अति गोड खाल्ल्याने मधुमेह होतो ?
हॅ हॅ हॅ
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
पुढील भागाच्या प्रतीक्षेत, 🙂
संतोष
धन्यवाद श्री संतोषजी
वाचकांच्या निरित्साहा मुळे , अत्यल्प प्रतिसादा मुळे मी या विषयावर आता जास्त काही लिहू शकणार नाही क्षमस्व
सुहास गोखले
छान .. तुमच्या लेखातील नुसतया गोड पदार्थांचे वर्णन वाचून खाण्याची तिर्व ईछा झाली …
पुढील लेखांची आतुरतेनं प्रतीक्षा…..
धन्यवाद श्री नरेंंद्र जी
सुहास गोखले
मस्तच…
धन्यवाद श्री अंकुशजी
सुहास गोखले
Apratim lekha aaple margadarshan asecha labhat raho
धन्यवाद श्री हिरालालजी
सुहास गोखले
जिलेबी, रसमलाई… तोंडाला पाणी सुटलं सर👌👌👌
खुप छान लिहिलात सर🙏
धन्यवाद श्री सुशांतजी
मी फक्त लिहायचे आपण खायचे ! काय वेळ आणली गेली नै साध्या लोणावळा चिक्कीला हात लावता येत नाही, जिलेबी रसमलाई आता पुढच्या जन्मात !
सुहास गोखले
लेख वाचून जिलेबी खायची तीव्र इच्छा झाली. सांगलीचा हिसका!!! मला आपण कोकणात बर्वे यांना दाखवलेला हिसका आठवला. मध्ये आपल्याकडे कडकनाथ कोंबड्यांचे फॅड आले होते. तेव्हा मी असे वाचले होते की कडकनाथ ची अंडी खाल्ली की शुगर कंट्रोल होण्यास मदत होते म्हणून. अप्रतिम लेखनशैली!!! मिरजेच्या बसप्पा हलवाई कडचे खाजा खात खात हि कमेंट लिहित आहे.😂😂. मधुमेह नक्की कशामुळे होतो हे जाणून घ्यायचे आहे. आपल्या पुढच्या लेखाची प्रतीक्षा करत आहोत!!!
धन्यवाद श्री अक्षयजी
शुगर कंट्रोल करेल असे कोणतेच प्रभावी अओषध आस्तीत्वात नाही , काही पदार्थ शुगर कंट्रोल करायला थोडिशी मदत करू शकतात इतकेच पण खरा जोर कडक पथ्य ,औषधे, व्यायाम , नियमीत (रोजच्या रोज) रक्त शर्करा तपासणी, जीवन शैलीतला बदल आणि मनाचा खंबीरपणा हाच काय तो उपचार उपलब्ध आहे. बाजारात कडकनाथ ची म्हणून काळा रंग लावलेली अंडी पण मिळतात !
सुहास गोखले
Dear Suhasji,
Please keep writing further on ‘Sakhareche Khanar Tyala’. Or may be post a video. You are just giving up when thing were getting interesting.
श्री प्रशांतजी,
धन्यवाद . आपल्या भावना / अपेक्षा समजू शकतो पण इतकी मेहेनत घेऊन लिहलेले कोणी वाचायला तैयार नाही हे पाहून दिल तुटते. मधुमेह किती गंभीर आहे याची लोकांना कल्पना नाही मी गेले दहा वर्षे भोगतोय पण मी अभ्यास करुन बरीच माहिति मिळवली जी माझ्या डॉक्टरांपाशी सुद्धा नव्हती ! माझे डॉक्टर मला नेहमीच (गमतीत) म्हणतात” गोखले मधुमेहा बाबतीत माझ्या पेक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे !” माझा मधुमेह बरा झाला असे मी अजिबात म्हणत नाही पण मी त्यावर अत्यंत चांगले नियंत्रण ठेवले असे निश्चितच म्हणू शकतो. आणि हे साध्य करताना मी अशा काही गोष्टी अवलंबल्या आहेत की ज्या मधुमेह्यांनाच काय त्यांच्या डॉक्टरांना सुद्धा माहिती नसाव्यात. या सार्या अनुभवाचा लाभ लोकांना द्यावा असे फार मनात होते पण लोकांना काहीतरी झटपट उपाय तोडगा पाहीजे जसे एखादे औषध जे आज रात्री घेतले उद्या सकाळी मधुमेह गायब ! तो माझ्या कडे नाही हे कळताच लोकांनी माझ्या कडे पाठ फिरवली असे दिसते. ज्यांच्या साठी इतकी मेहनत करून , मौल्यवान वेळ खर्च करून लिहायचे त्यांना त्याची काडीचीही फिकीर नसेल तर मला ही हा उपद्व्याप करण्याची काही हौस नाही असे वाटले.
सुहास गोखले
लेख चांगला गोड आणि खुमासदार झाला आहे. मस्तच..
पुढचा भाग ओरपायच्या तयारीत..,😀
श्री दीपकजी अशी ‘ओरपायची’ भाषा बोलून तुम्ही आमाला जलिवताय जणू , कोठे फेडाल हे पाप म्हंतो मी
सुहास गोखले
सुहास सर,
इथे ‘तहान लागयावर विहिर खोदू’ प्रकारची चूक माणूस करतो. पण हे लेख वाचून माणूस नक्की शहाणा होईल. सुंदर माहिती आहे. कृपया हे लेख बंद करू नका. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. – स्मृती.
सौ स्मृतीजी धन्यवाद वेळ मिळेल तसे पुढे काही लिहायचा प्रयत्न करेन. माझ्या कडे बरीच माहित्यी आहे पण ते सगळे लिहण्यात माझा फार वेळ जातो आणि इतकी सगळी मेहेनत करून लिहलेले फारसे कोणी वाचत नाही ही खंत आहे.
सुहास गोखले